मूल : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवुन मूल येथे वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. भाजपानिष्ठ असलेल्या नगर परिषदेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या 28 कोटीच्या योजने मधून शहर वासियांना सात दिवस चोवीस तास स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते, पण आज चोवीस तास तर सोडा एक वेळाही मुबलक पाणी नागरिकांना मिळत नाही. अशी ओरड मागील वर्षभरापासून शहरात आहे. त्यामुळे होवू घातलेल्या निवडणूकीच्या प्रचारावेळी गेलेल्या माजी नगरसेवकांसह त्यांच्या समर्थित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून त्यांची चांगलीच कोंडी होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
जनतेच्या मागणीस्तव मूल शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान अभियाना अंतर्गत सन २०१९ मध्ये २८ कोटी ८८ लाख रुपये किमतीची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. मुल शहराला दररोज जवळपास ४० हजार लिटर पाण्याची गरज आहे. आधीच्या तुलनेत पाणी पुरवठ्याची ही व्याप्ती अडीच पट वाढली आहे. मूल शहरात आज घडीला नळ धारकांची संख्या ५ हजारावर आहे. त्यानुसार सर्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असलेला पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र शहरातील काही भागात नळाला बारीक धार येत असल्याने नागरिकांना आवश्यक पाणी मिळत नाही. त्यामुळे महिला कमालीच्या त्रस्त झाल्या असून नगर परिषद प्रशासना विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. सध्या नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने मागील काळात सत्तेत असलेल्या माजी नगरसेवकासह त्यांच्या पक्षाच्या समर्थित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना प्रचाराच्या वेळी महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तर विरुद्ध पक्षाला या विषयावर घेरण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत पाणीपुरवठ्याच्या विषय चांगलाच गाजत आहे.
योजनेसाठी लाखोचा खर्च : पाणीपुरवठ्याची देखभाल दुरुस्ती, तुरटी, ब्लिचिंग क्लोरीनसाठी, बोरवेल दुरुस्ती, साहित्य खरेदी व विज बिलावर वर्षापोटी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नाही वर्षाला लाखो रुपये पाणीकर वसूल करण्यात येतो, तरीही नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही. त्यामुळे नगरपरिषद प्रशास ना सोबतच तत्कालीन पदाधिका-याप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अपुऱ्या पाणीपुरवठ्याचे कारण काय ? : वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या शहरात चार पाण्याच्या टाकी आहेत. त्याची पाणी साठवणूक क्षमता २०.३ लाख लिटर एवढी आहे. जल शुद्धीकरण केंद्राची क्षमता ६.५ दशलक्ष लिटर आहे. तरीही मूल शहराला पाण्याचां तुटवडा असून मुबलक पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नेमके पाणी कुठे मुरते. हे एक कोडेच आहे









